कन्या शाळेच्या वॉट्स अप ग्रुप वर आज हि बातमी वाचली आणि माझी विचारचक्रे परत एकदा सुरु झाली. देवल सर हे माझ्या शालेय जीवनातील आदर्शांपैकी एक . ५ वी ला गेल्या नंतर हे आपले पर्येवेक्षक आणि इतिहासाचे शिक्षक अशी ओळख झाली पण येणाऱ्या काही वर्षांत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंची ओळख होत गेली. चित्रकला हा त्यांचा अतिशय आवडीचा विषय होता.. तसेच ऑफ तासाला त्यांच्या काढून गोष्टी ऐकायला मिळणे म्हणजे परवणीच . त्यामुळे आज एखादा रिकामा तास आहे तर हमखास देवल सर च यावेत अशी मनोमन प्रार्थना करायचो आम्ही आणि एकदा भुताच्या गोष्टी रंगल्या की पुढच्या तासाचा शिक्षक बाहेर वाट पाहत आणि आमच्या चेहेऱ्यावरचा आनंद पाहत उभा असणार हे नक्की. जितक्या तन्मयतेने ते गोष्टी रंगवून सांगायचे तितक्याच उत्तम दर्जाचे त्यांचे विविध गुण वार्षिक स्नेहसंमेलनाला पाहायला मिळायचे. आमच्या शाळेत एक अलिखित प्रथा होती ती म्हणजे दरवर्षी गॅदरिंगला शिक्षकांचं एक नाटक असणारच. आणि त्यात आम्हाला यांचे गायन, वादन, अभिनय असे अनेक पैलू अनुभवायला मिळायचे. बरं हे सर जितके रसिक तितकेच कडक शिस्तीचे. मला माझा शाळेच्या पूर्ण १० वर्षात २ वेळा देवल सरांकडून शिक्षा झालेली आठवते. एकदा शाळेत उशिरा आले होते म्हणून लाकडी पट्टीने हातावर छडी मिळाली होती ती आज पर्यंत लक्षात राहिलीये. आणि त्या नंतर शाळेत च काय कुठेही उशिरा जाण्याची माझी काय बिशाद!! दुसरी गोष्ट म्हणजे मी इतिहास नागरिक शास्त्राच्या तासाला घरचा अभ्यास पूर्ण केला नाही म्हणून मला आणि बऱ्याच मुलींना त्या दिवशी वर्गाच्या बाहेर उभं केलं होतं. त्या दिवशी वर्गात काय शिकवताहेत हे खिडकी मधून ऐकायला लागल्यानंतर शिक्षकांची खरी किंमत कळली. आणि अश्या गोष्टी शाळेत घडल्यावर आमच्या आई बाबांना पण यावर काही आक्षेप नसायचा आणि आम्ही पण अशा प्रसंगांना सुधारण्याची एक संधी म्हणून पाहायचो . पण आता शाळा, पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि समाज हे सगळेच बदलताहेत. हे आजच्या पिढीला कसा समजावून सांगायचं? आणि मला हा प्रश्न पडायला तुम्हाला देवाघरी जाण्याची वेळ उजाडली हे दुर्दैवच. पण तुम्ही दिलेली शिकवण आयुष्यभर लक्षात ठेवेन आणि येणाऱ्या पिढ्यांना देण्यातही हातभार लावेन हे आश्वासन नक्कीच देईन.
एक नम्र विद्यार्थिनी,
श्रुति भिडे - हिंगे
Comments
Post a Comment